बलसागर भारत होवो.....

15 August Dinvishesh | १५ ऑगस्ट दिनविशेष


"बलसागर भारत होवो....."

 

       "बलसागर भारत होवो....." म्हणायला हे फक्त एक देशभक्तीपर गीत आहे, आणि "...विश्वात शोभुनी राहो" असे म्हटल्यावर तर प्रत्येकच भारतीयांची छाती गर्वाने फुलून जाते. कारणही तसंच साजेस आहे. कारण भारत हा वैभवसंपन्न, संपत्तीवान देश आहे. स्वतः भगवंत येथे दहा-दहा वेळा येऊन गेले. गंगा-यमुना-सरस्वती सारख्या पवित्र नद्या इथे आहेत. भव्य-दिव्य निसर्गसौंदर्यही  भारताला लाभलेलं आहे. इतर देशांच्या तुलनेत ही संपत्ती फक्त भारतालाच भेटलेली आहे. पण खरंच आजच्या भारताबद्दल विचार करतो तेव्हा प्रश्न निर्माण होतो की 'भारत खरंच बलसागर आहे की बनवायचा आहे?'

      हजारो वर्षांपासून संपूर्ण विश्वासाठी आदर्श असणारा भारत आता मात्र कंगाल झालाय असे वाटते. पण खरे पाहता जाणवते की जिथे हजारो वर्षांपासून जगाला मार्गदर्शन होत आहे ती भूमी कंगाल कशी होऊ शकते?? ते शक्यच नाही. पण संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करणाऱ्या भारतालाच आज मदतीची गरज भासत आहे हेही तितकेच खरे. याचा अर्थ भारतातील लोक कमजोर झाले किंवा अज्ञानी झाली असे मुळातच नाही. जगाला मार्गदर्शन करण्याची “कृष्णं वंदे जगद्‍गुरूम” ची परंपरा हजारो वर्षांपासून या मातीत आहेच याचीच साक्ष देतात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नंडेला, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस, हे सर्व मूळचे भारतीय व्यक्तिमत्त्वच आहेत.

Download


      संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरणारा भारत मात्र काही काळ परकियांच्या पारतंत्र्यात होता. भगवंताच्या इच्छेने भारत स्वतंत्र तर झाला पण आज ७५ वर्षांनंतरही भारत त्याच समस्यांचा सामना करतो आहे, ज्या समस्या भारतासमोर स्वातंत्र्याअगोदर होत्या, आणि ज्या समस्या सोडवून समृद्ध होण्यासाठी स्वातंत्र्य मिळाले आहे. पण आजचा भारत त्या समस्या सोडविण्यासाठी कर्तव्यच्युत झालेला दिसतो. भारतातील लोकांची मानसिकता बदललेली दिसते. भारतीयांमध्ये काम करण्याची क्षमता तर आहेच पण तिचा वापर होत नाहीये.

Download Independence day post


Watch More

      आमच्यामध्ये असलेल्या क्षमता, ताकद आम्हाला समजत नाहीत, आणि समजल्याच तर त्यांचा योग्य वापर होत नाही. त्यामुळेच आम्हाला संविधानाने दिलेल्या हक्कांचा गैरवापर होताना दिसतो. आमच्या देशातील युवकांची शक्ती देशासाठी कार्य करण्याची, भारताचे नाव रोशन होईल असे कार्य करण्यासाठी झिजायला हवी. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र यामध्ये प्रगती करण्याऐवजी आमच्या युवकांची शक्ती कट्ट्यावर बसून टवाळकी करण्यात आणि मुलींची छेड काढण्यात वापरली जाते.

      आमच्या देशातील मुलींना प्रगती करण्यासाठी संविधानाने काही मूलभूत अधिकार दिले आहेत. मुलींना अधिक सुविधा देण्यात येतात, पण त्याचा वापर एखाद्याकडून जबरदस्तीने एखादं काम करून घेण्यासाठीच केला जातो. किंवा कोणावर जबरदस्तीने गुन्हा दाखल करण्यासाठीच केला जातो. हे सगळं होण्याचं कारण आम्हाला लहानपणापासूनच त्या गोष्टी बघायला मिळतात व ते चुकीचं आहे असं सांगितलंच जात नाही. आम्हाला जर अशा योग्य अयोग्य गोष्टी कळत गेल्या तर कदाचित परिस्थिती वेगळी असेल. राष्ट्राबद्दल प्रेम आमच्या मनात निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी आजच्या बालक व युवकांपासून सुरुवात करावी लागेल, शाळा-कॉलेजात जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीला भारताचा मूळ इतिहास म्हणजेच रामायण-महाभारत, संत-आचार्यांचे चरित्र, सावरकरांचे सहा सोनेरी पाने, रघु-राम-युधिष्ठीर-शिवाजी महाराज अशा आदर्श राजांचे चरित्र सक्तीने शिकवण्यात यावे. तसे झाले तर प्रत्येक भारतीयाला राष्ट्राबद्दल प्रेम निर्माण होईल, गौरव वाटेल आणि प्रत्येक भारतीय राष्ट्राबद्दल निष्ठा बाळगेल.

Download


      भारतीयांमध्ये एकदा का राष्ट्रनिष्ठा निर्माण झाली की आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची जी स्थिती आहे ती बदलेल. मुलींच्या अंगावर ॲसिड फेकणाऱ्या युवकाला योग्य विचार दिले तर तो बदलेल, आणि ऍसिड फेकण्याऐवजी भाला फेकून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक जिंकून भारताचं नाव रोशन करणारा नीरज चोप्रा झाल्याशिवाय राहणार नाही.

      एका गाडी चालकाची चूक नसतानाही आपल्याला मिळालेल्या हक्क/सुविधांचा गैरवापर करत त्याला भर रस्त्यात मारहाण करणे हे एका स्त्रीला कधीही न शोधण्यासारखेच आहे. पण त्याच स्त्रीला जर नैतिक मूल्यांची शिकवण दिली राष्ट्राभिमान जागृत केला तर तीच स्त्री गीता फोगट प्रमाणेच जागतिक स्तरावरील कुस्तीपटू बनून पदक मिळवून संपूर्ण राष्ट्राचा अभिमान बनु शकते.

      काम मिळत नाही कोणी काम देत नाही म्हणून मुलांनी एखादा सांगेल ते काम करणे किंवा मुलींनी वेळप्रसंगी स्वतःच्या शरीराची विक्री सुध्दा करणे, यापेक्षा मी एका समृद्ध भारताचा/ची वंशज आहे म्हणून मला असे कार्य शोभत नाही असा स्वाभिमान बाळगला तर आमची तरुण पिढी जागतिक स्तरावर ऑलिंपिकमध्ये सामना हरल्यानंतरही संपूर्ण विश्वाचे हृदय जिंकणाऱ्या भारतीय हॉकीच्या संघाप्रमाणे राष्ट्राचा अभिमान झाल्यावाचून राहणार नाहीत.

      आमच्या भारतातील लोकांमध्ये क्षमता तर आहेतच पण त्यांना ओळखून, त्यांना योग्य रस्ता देऊन विकसित करणं आम्हाला जमलं पाहिजे. यासाठी गरज आहे ती राष्ट्राबद्दल निष्ठा ठेवण्याची, राष्ट्राबद्दल काहीतरी करण्याची इच्छा मनात निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी गरज आहे ती राष्ट्राबद्दल अभिमान बाळगण्याची मला माझा देश,  त्याची भौगोलिक समृद्धी,  सांस्कृतिक परंपरा,  ऐतिहासिक वारसा,  देशाभिमान,  कुलाभिमान, व परंपरेचा अभिमान असणे गरजेचे आहे. असे झाले तरच आपला भारत सुजलाम-सुफलाम होईल. कारण कोणत्याही राष्ट्राला समृद्ध होण्यासाठी त्या राष्ट्रातील लोकांमध्ये राष्ट्रनिष्ठा व देशाभिमान असणे गरजेचे आहे. असे झाले तरच ७४ वर्षांपासून असलेल्या समस्यांचा सामना आपण करू शकतो. असे झाले तर खऱ्या अर्थाने भारत हा बलसागर तर होईलच, पण विश्वात शोभुनी राहणारा देश सुद्धा बनेल. तसेच इथून पुढचा भारत हा आदर्श आणि जगासाठी मार्गदर्शक असेल. चला तर मग या स्वातंत्र्यदिनी त्यासाठी कटिबद्ध होऊया.

जय हिंद.


article by Tejas Ranbawale | content writer @techunger

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या